नाशिक – गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव मोठया प्रमाणावर घसरले आहे.त्यामुळे नाशिक जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणावर आक्रमक झाले आहेत.कांद्याला कवडीमोल किंमत मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.कांद्याची विक्री केल्यानंतर अगदी दहा ते १०० रुपये इतके पैसे हातात येत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्याने
आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांद्याची होळी करत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
शेतकर्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. त्यामूळे शेतकरी आक्रमक झाले असून येवला तालुक्यात शेतकरी कृष्णा डोंगरे या शेतकर्याने होळीच्या दिवशी आपल्या दीड एकरातील कांद्याची होळी केली. या शेतकर्याने पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण दिले होते. अखेर आजच्या होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकर्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकर्यांना वार्यावर सोडून दिले आहे. शेतकर्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकला आहे.आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत शेतकर्याने व्यथा मांडली.आपल्या हाताने पिकवलेला कांदा असा बेचिराख होतांना पाहून हा शेतकरी ढसाढसा रडला.मुल गेल्यासारखे दुःख होत असल्याची प्रतिक्रिया डोंगरे यांनी व्यक्त केली.