मुंबई – समृध्दी महामार्गाला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले असून या १०० दिवसांत समृध्दी महामार्गावरील नागपूर, औरंगाबाद आणि पुणे विभागात एकूण २५३ अपघात झाले आहेत. ३१ मार्च पर्यंत २८ मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांच्या रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात नागपूर विभागात झाले आहेत.
समृध्दी महामार्गावर वेग मर्यादा ताशी १२० आहे. शिवाय सध्यास्थितीत समृध्दी महामार्गावर फार वाहतूक नसल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याच्या घटना किंवा वन्यजीव प्राणी रस्त्यांवर येत असल्याने अपघातास कारण ठरत आहे. विदर्भात सर्वाधिक वन्यजीव प्राण्यांचे स्थळ असल्याने नागपूर विभागात सर्वाधिक अपघात दिसून येत आहे. त्यातही सर्वाधिक अपघात आणि मृत्यूचे प्रमाण मलकापूर दरम्यान झाल्याचे दिसून आले आहे.
नागपूर विभागातील खुर्सापुर,जाम,धामणगाव रेल्वे,आमनी,मलकापूर मिळून १२ जीवघेण्या अपघातामध्ये १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २८ गंभीर अपघात झाले असून त्यामध्ये ८१ नागरिक गंभीर जखमी झाले आहे, शिवाय ४९ किरकोळ अपघात झाले असून त्यात ९८ नागरिक किरकोळ जखमी झाले आहे.तर ५९ अपघातांमध्ये कोणत्याही दुखापती झाल्यानसून असे एकूण १४८ अपघात समृध्दी महामार्गावर झाले आहेत.