लोणंद- सातारा जिल्ह्यातील खंडाळा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेले वीर धरण ‘ओव्हरफ्लो ‘ झाले आहे. त्यामुळे काल रात्रीपासून पुन्हा एकदा नीरा नदीत विसर्ग सुरू केला आहे.हा पाण्याचा एकूण विसर्ग २३ हजार ३३५ क्युसेक्स असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे.
गेल्या चार दिवसांत नीरा खोर्यातील धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने काल रात्री ८.२० वाजता वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली . भाटघर धरणातून विसर्ग सुरू केल्याने वीर धरणाची पाणीपातळी आणखीनच वाढली. त्यामुळे निरा नदीमध्ये आधीचा डाव्या कालव्याचा १५० क्युसेक विसर्ग तसाच ठेवून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे या नदीमध्ये २३ हजार १८५ क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग २३ हजार ३३५ क्युसेक्स असणार आहे.यापुढे पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार आहे.