वाशिम: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीला लालेला गहू, हरभरा व फळ पिकांचे नुकसान झाले. शेकडो हेक्टर वरील डाळिंब,निंबु बागांसह कांदा,उन्हाळी मूग, रब्बी गहू,हरभरा, भाजीपाला या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित करून विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. आज ३१ मार्च रोजी कारंजा तालुक्यात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा सोबतच भाजीपाला आणि फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी १७ मार्च रोजी मालेगाव व इतर ठिकाणी गारपीट झाल्याने फळ बागाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर शुक्रवारी कारंजा तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.