मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ६ तास बंद! प्रवाशांची गैरसोय

मुंबई – मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून दिवसाला सुमारे ८०० हून अधिक विमानांचे उड्डाण आणि आगमन होते. त्यामुळे धावपट्टीवर कमालीचा ताण असतो. यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कामे मंगळवारी करण्यात आली. यासाठी सर्व विमान वाहतूक सहा तास बंद ठेवण्यात आली होती. मात्र पूर्वसूचना असतानाही काही प्रवाशांना याची माहिती नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली.

देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्टींची मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मंगळवारी २ मे रोजी करण्यात आली. याकरिता विमानतळावरील सर्व वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, यावेळी धावपट्टी आणि टॅक्सी वेवरील जवळपास पाच हजार एरोनॉटिकल ग्राऊंड लाईट्स सर्व्हिस तपासण्यात आल्या. तसेच विमानांना दिशात्मक मार्गदर्शन करणाऱ्या १ हजार ३०० ग्राऊंड मार्किंग्ज नव्याने रंगवण्यात आल्या. शिवाय धावपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या कमी करण्यासाठी दोन हजारहून अधिक नाले साफ करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top