नवी मुंबई – अण्णासाहेबांची जयंती म्हणजे माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचे व्यासपीठ आहे. अण्णासाहेबांनी अथक संघर्षातून निर्माण केलेल्या कायद्याचा आत्मा आम्ही मरु देणार नाही आणि बदलूही देणार नाही. तसेच माथाडी कायद्याशी छेडछाडही आंम्ही करणार नाही, तो रद्दही करणार नाही,अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतिने माथाडी कायद्याचे जनक कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नवीमुंबईतील कांदा-बटाटा मार्केटच्या प्रांगणात आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.प्रारंभी माथाडी नेते गुलाबराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात कामगार मंत्र्यानी माथाडी कायद्यात सुधारणा करताना आत्मपरीक्षण करण्याची गरज होती असे सांगितले.याप्रसंगी माजी मंत्री गणेश नाईक, युनियनचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन पोपटराव देशमुख यांनी केले. यावेळी आमदार प्रवीण दरेकर शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंदाताई म्हात्रे माथाडी हॉस्पिटलचे डॉ. हणमंत पाटील, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव तसेच युनियनचे सर्व पदाधिकारी,माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.