नागपूर – भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून देशभरातील संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र कासवांची संख्या, त्यांच्या सवयी, घरटे करण्याचे स्थान,घरट्यांमध्ये नव्याने उत्पत्ती होणाऱ्या कासवाचा अभ्यास केला जात आहे. २०२३-२४ मध्ये देशभरात केलेल्या अभ्यासात महाराष्ट्रात ऑलिव्ह रिडले म्हणजेच समुद्री कासवांची तब्बल २० टक्के घरटी असल्याचा पहिला अहवाल वन विभागाला मिळाला आहे.
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून लुप्त होत असलेल्या पक्षी, प्राण्यांसह इतरही वन्यप्राण्यांचा अभ्यास करून संशोधन करण्यात येते. त्याअंतर्गत भारत सरकारकडून देशभरातील समुद्र किनाऱ्यावरील समुद्री कासवाचा अभ्यास केला जाणार आहे. हा प्रकल्प २३-२४ ते २८-२९ पर्यंत देशभरात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ७२० किलोमीटर लांबीच्या पश्चिम किनारपट्टीवर २०२३-२४ पासून या अभ्यासाला प्रारंभ झाला आहे.अभ्यासाचा पहिला अहवाल राज्य वन विभागाला मिळाला आहे.
‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने केलेल्या अभ्यासात महाराष्ट्रातील कासवांच्या घरट्यांत दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अहवालानुसार २०२३-२४ मध्ये दोन हजार ५८४ घरटी आढळून आली आहेत. २०२२-२३ मध्ये घरट्यांची संख्या एक हजार ३८७ होती. देशातील समुद्री कासवांच्या घरट्यांपैकी २० टक्के घरटी महाराष्ट्रात असल्याचे अहवालात नमूद केले आहे. राज्यातील समुद्र किनारा असलेल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत हा अभ्यास करण्यात आला. त्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अधिक आढळून आली आहेत. वेळास, अंजर्ले, गुहागर, वायगणी ही घरट्यांचे मुख्य स्थळे असल्याचेही अहवालात म्हटले आहे.