मलप्पुरम –
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटली. रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास तुवालाथीराम समुद्रकिनाऱ्याजवळ ही घटना घडली. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत बोटीतील २२ पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्य झाला, तर ७ जणांची प्रकृती गंभीर आहे.
ही बोट सुमारे ४० हून अधिक पर्यटकांनी भरली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफच्या जवानांनी त्वरित बचावकार्य सुरु केले. त्यांनी आतापर्यंत २२ मृतदेह पाण्यातून काढले आहेत. बुडालेली बोटही किनाऱ्यावर आणली आहे. आणखी काही पर्यटक बुडाले असण्याची शक्यता सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोटीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
या दुर्घटनेनंतर आज केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दुःख व्यक्त केले. ‘केरळमधील मलप्पुरममध्ये बोट दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी दुःखी आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या प्रति माझ्या संवेदना, असे मोदींनी ट्विट करत मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून (पीएमएनआरएफ) २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.