मुंबई- देशातील सर्वांत मोठा समुह पुनर्विकास प्रकल्प समजल्या जाणार्या दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.कारण या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सैफी ज्युबिली स्ट्रीटवरील सलामत हाऊसमधील पाच रहिवाशांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.काही मोजके रहिवाशी संपूर्ण पुनर्विकास रोखून धरू शकत नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.
चार वर्षांपूर्वी अब्दुल रहमान अबरार शेख,अब्दुल सुभान अबरार शेख,अब्दुल हुसैन अबरार शेख,अख्तारी अबरार अहमद शेख आणि शेख सलमा अब्दुल रेहमान यांनी रिट याचिका दाखल केल्या होत्या.आपण सैफी ज्युबिली स्ट्रीट भेंडी बाजारवरील भूखंडाचे सहमालक आहोत,असा दावा करीत त्यांनी सैफी बुहानी अप्लिपमेंट ट्रस्टमार्फत केल्या जाणार्या पुनर्विकासाला विरोध केला होता.तसेच म्हाडाच्या ‘सी-१’ विभाग कार्यकारी अभियंत्यांनी महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अॅक्ट,१९७६ च्या कलम ९५(ए) अन्वये जारी केलेली नोटीस आणि आदेशाला आव्हान दिले होते.त्यांच्या याचिकांवर म्हाडातर्फे प्रकाश लाड, महापालिकेतर्फे सागर पाटील आणि ट्रस्टतर्फे गौरव जोशी या वकिलांनी आक्षेप घेतला.याप्रकरणी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी ऑक्टोबरमध्ये निकाल राखून ठेवला होता.त्यानंतर नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळल्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.