कराड- सातारा जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.पावसाचे प्रमाण वाढत चालल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाटण,जावळी आणि महाबळेश्वर आदी तालुक्यातील दरड प्रवण गावातील सुमारे ७०० ते ८०० कुटुंबाचे स्थलांतर केले जात आहे.
या सर्व कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. या तिन्ही तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही खबरदारी घेण्यात आली आहे.दरम्यान, काल गुरुवारी दुपारी कण्हेर धरणाचे वक्र दरवाजे उचलून ५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वेण्णा नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या दुष्काळी तालुक्यातही यंदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे.