मुरुड –
दिवाळी सणावर महागाई मुळे मंदीचे सावट असल्याने खरेदीचा उत्साह दिसत नाही.मुरूडमधील काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले की, दिवाळीत फटाक्यांना मागणी नाही. त्यामुळे पूर्वी सारखी विक्री होईल असे वाटत नाही. नविन कपडे खरेदी, सोने, वाहने खरेदीसाठीदेखील गर्दी दिसून येत नाही.भाजीपाला, मासळी, पेट्रोल, डिझेल आणि रोजच्या जीवनातील वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य जनता होरपळत आहे, असे ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.
मुरूडमधील धरमचंद जैन यांनी सांगितले की मंदीमुळे मुख्य बाजारपेठ थंडावली असून दिवाळीत उलाढाल फारशी होईल, असे संभवत नाही.नेमक्याच दुकानातून ग्राहक खरेदीसाठी आलेले दिसून येत आहेत. काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले की महागाईमुळे फटाके विक्री घटली आहे. मंदी ओळखून आम्ही यंदा ७० टक्केच फटाके विक्रीस आणले आहेत. सध्या मुरूडमध्ये सुमारे १० फटाक्यांची दुकाने आहेत. पण पाहिजे तसा फटाक्यांना उठाव नाही. मुरूडमधील फटाकेविक्रेते कुणाल सतविडकर म्हणाले की, फटाक्यांच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली आहे. महागाईमुळे राज्यातील जनता त्रस्त आणि हैराण झाली आहे.जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पैसे नसल्याने फटाके खरेदीसाठी येणारे ग्राहक अगदीच कमी प्रमाणात येत आहेत .