जळगाव – जळगाव जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ढगाळ हवामान आणि थंडीचा अभाव यामुळे ज्वारी पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांची पाने सुकून पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
याच कारणामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन कमी होण्याची भीती आहे. अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच आता रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. दरवर्षी १२० ते १२५ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न होत असताना यंदा या पिकाचा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटू शकते. शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च परत मिळवण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या नुकसानाची दखल घेण्याची मागणी केली आहे. ढगाळ वातावरणामुळे ज्वारीसह अन्य पिकांवर सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. हरभरा, गहू, मका या पिकांवर देखील किडींचा प्रभाव पाहायला मिळत आहे.