ठाणे – शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून १५०० रुपये इतका जादा दंड आकारला जात आहे. मात्र दररोज मिळत असलेल्या उत्पन्नातून आर्धी रक्कम दंडाला जात असल्यामुळे अनेक रिक्षा चालक त्रासले आहेत. या जादा दंड आकारणी विरोधात आता या रिक्षाचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, महात्मा फुलेनगर त्याचबरोबर शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर भागातूनही अनेक नागरिक ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात. या सर्वच भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच ठाणे स्थानकापासून या परिसराचे अंतर देखील जास्त आहे. यासाठी ठाणे शहरात सार्वजनिक वाहतूकीसाठी टीएमटीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, या बसगाड्या पुरेशा प्रमाणात नाही.तसेच मीटर रिक्षाने प्रवास करणे नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकजण शेअर रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.पण रिक्षाचालकांना केवळ तीन प्रवासी घेऊन जाणे परवडत नसल्याने ते चार प्रवासी घेऊन वाहतूक करतात.पण अशा रिक्षाचालकांवर अशी जादा दंडाची कारवाई केली जात आहे.स्थानक परिसरातील गावदेवी मंदिर परिसर, गावदेवी मैदान परिसर, सिडको, मासुंदा तलाव परिसर अशा विविध भागात शेअर रिक्षा चालकांचे थांबे आहेत.