नाशिक :
गिरणा नदीत काल मासेमारी करण्यासाठी गेलेल्या १० ते १२ जणांची वायूदलाच्या हेलिकॉप्टरने सुखरूप सुटका केली.
मालेगाव शहरातील १० ते १२ जण संवदगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात काल दुपारी मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र अचानक पाणी वाढल्याने हे सर्वजण नदीपात्राच्या मध्यभागी अडकून पडले होते. रात्रभर अडकून राहिलेल्या या १० ते १२ जणांना आज सुखरूप बाहेर काढण्यात आले.
चणकापूर व पुनद धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू असल्याने या दोन्ही धरणातून १५ हजार पेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू आहे. असे असतानाही धुळे व मालेगाव शहरातील काहीजण संवदगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात काल मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीला पाणी कमी होते. परंतु अचानक पाणी वाढल्याने हे सर्वजण नदीपात्राच्या मध्यभागी अडकून पडले. यासंदर्भातील माहिती मनपाच्या अग्निशमनदलाला मिळताच आग्निशमन अधिकारी डॉ. संजय पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन पथकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु पावसाची संततधार सुरु राहिल्यामुळे नदीत पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे त्यांना वाचवण्यात अडथळे येत होते. त्यानंतर आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वायू दलाच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करत गिरणा नदीपात्रात अडकलेल्या या सर्वांचे प्राण वाचवले.