गलवानमध्ये झालेल्या रक्तरंजित
संघर्षातील शस्त्रे चीनने खरेदी केली

बीजिंग : एकीकडे चीन सीमावाद सोडवण्यासाठी वाटाघाटी करत आहे, तर दुसरीकडे आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी मोठी शस्त्रे खरेदी करत आहे. चीन जी शस्त्रे खरेदी करत आहे, ती शस्त्रे २०२० च्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झालेल्या रक्तरंजित चकमकीतील आहेत. त्यामुळे पुन्हा गलवानची पुनरावृत्तीच चीनकडून होऊ शकते हे चित्र दिसत आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी ने \’कोल्ड वेपन्स\’ श्रेणीतील \’कम्बाइन्ड मेस\’ शस्त्रे खरेदी केली आहेत. जी २०२० च्या गलवान व्हॅली चकमकीमध्ये वापरली गेली होती. या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. या रक्तरंजित चकमकीनंतर चीन आणि भारत यांच्यातील लष्करी संघर्ष वाढला. त्यांनतर भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी चीनसोबत भारताच्या अनेक चर्चा झाल्या.
चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणात सीमेवरील परिस्थिती सामान्य करण्यासाठी भारत आणि चीनने सीमावाद योग्यरित्या सोडवला पाहिजे. यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. मात्र सार्वजनिक व्यासपीठावर भारताशी संबंध सुधारण्याचे आवाहन करणाऱ्या चीनने जानेवारीपासून लष्कराची ताकद वाढवत असल्याचे दिसत आहे.

Scroll to Top