कोल्हापूर – गोवा राज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे काजूपासून मुल्यवर्धित उत्पादने घेण्याची आवश्यकता आहे. काजूपासून मद्यनिर्मिती आणि काजू बिया परतावा याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
चंदग़ड येथे नगरपंचायतीच्या कै.नगसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडन्सी इमारतीचे भूमिपूजन, शिवसृष्टीचे लोकार्पण, प्रशासकीय इमारतीच्या पायाभरणी व कोनशिला समारंभ, चंदगड नगरपंचाती वतीने नागरी सत्कार समारंभ आदी कार्यक्रम अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. सत्कार समारंभानंतर झालेल्या सभेत बोलताना पवार यांनी ही माहिती दिली.
काजू पिकाच्या विकासासाठी सरकारने १,३२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.या निधीतून काजू पिकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होईल.चंदगड मतदार संघातील कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
चंदगड मतदारसंघात विकासाची ८५० कोटी रुपयांची कामे झाली आहेत.चंदगड येथे ट्रॉमा केअर युनिट आणि उप जिल्हा रुग्णालय उभारण्याचे प्रय़त्न सुरू आहेत,अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी याप्रसंगी बोलताना दिली.