कोल्हापूर – कोल्हापूर आणि परिसरात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. कोल्हापूर शहरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर आणि जिल्हात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे करवीर तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या, तर काही ठिकाणी झाडे वीजेच्या तारांवर पडल्याने अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, इब्राहीमपूर, गवसे, पुंद्रा, कानूर, कोकरे, अडुरे परिसरातही पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका हा आजरा या शहराला बसला. शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले.
कोल्हापुरात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले
