ठाणे- शहरातील घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी फोडण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख असा जोडरस्ता बांधला जाणार आहे. मात्र त्यासाठी तब्बल २१९६ झाडांची कत्तल केली जाणार आहे. प्रकल्पासाठी तोडल्या जाणार्या या झाडांपैकी केवळ ५४९ झाडांचेच पुनररोपण केले जाणार आहे.त्यामुळे या वृक्षतोडीवरून हा प्रकल्प वादात सापडण्याची शक्यता आहे.
कापूरबावडी ते गायमुख हा नियोजित जोडरस्ता ९.३० किमीचा संपूर्ण सिमेंट काँक्रीटचा असणार आहे. त्यासाठी ५६० कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने झाडे हटविण्याची परवानगी देऊन हे काम मार्गी लावावे अशी मागणी एमएमआरडीएने केली आहे. घोडबंदर रोडवरून मुंबई, गुजरात आणि इतर राज्यांच्या दिशेने जाणार्या वाहनांची कायम वर्दळ दिसून येते. अनेकवेळा याठिकाणी वाहतूककोंडी देखील होते. ही समस्या सोडविण्यासाठी घोडबंदर रोडच्या दोन्ही बाजूंचे समांतर सेवा रस्ते मूळ मार्गात विलीन करून प्रत्येकी चार असे एकूण आठ पदरी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यातच या कापूरबावडी – गायमुख जोडरस्त्याचा समावेश आहे.