कोल्हापूर- कागल तालुक्यातील बोळावी येथे बिबट्याच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वन्य प्राण्यांचा गावच्या परिसरात वावर वाढल्याने मुलांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बोळावी येथे इयत्ता ७ वी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत बोळावीवाडी, ठाणेवाडी,हाळवाडी येथून विद्यार्थी शाळेला येतात. सकाळी एसटीने व संध्याकाळी एसटी नसल्याने पायी चालत जावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा जंगल आहे. मागील आठवड्यात जंगलात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ व मुलांमध्ये घबराट पसरली आहे.त्यामुळे मुले शाळेला जाणे टाळत आहेत. यापूर्वीही बिबट्या या भागातून फिरत होता. मात्र, वन विभागाने तरस असल्याचे जाहीर केल्यामुळे त्याकडे कुणी लक्ष दिले नाही; परंतु आता प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याने वनाधिकारी जागे झाले आहेत.कोल्हापूर वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र बिबट्याचा शोध लागलेला नाही.