छत्रपती संभाजीनगर- सामाजिक कार्यकर्ते बापू शांताराम गवळी(३४) यांना सुमारे १५ महिलांनी चपलांनी मारहाण करत धिंड काढून पोलिस ठाण्यात आणले. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथील माजी सरपंच विनायक सोनवणे व सरपंच सना अस्लम शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमण केल्याची तक्रार केल्याचा राग धरून हे कृत्य करण्यात आले. याप्रकरणी बापू गवळी यांच्या फिर्यादीवरून १५ महिलांवर कन्नड शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला.
याचप्रकरणात मीराबाई रामलाल पवार (४०) यांनी कन्नड शहर ठाण्यात फिर्याद दिली, यावेळी त्या म्हणाल्या की, ‘बापू गवळी यांना माझ्या नवऱ्याला का मारता, असे विचारले असता, त्यांनी जातीवरून शिवीगाळ करून माझा उजवा हात पिरगळला. त्यामुळे बापू गवळी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.’