मुंबई – मुंबईत पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. माझे नातेवाईक माझ्या विरोधात आहेत. माझ्या घरावर चालून येतात. हे सगळे सहन करून मी जिद्दीने उभा राहिलो. आता एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन, असा गंभीर इशारा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिला. लोकसभा निवडणुकीत असा लढलो की, मोदींनाही घाम फुटला. आता विधानसभेत त्यांची उरली सुरली गुर्मीही उतरवतो, असे खुले आव्हान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि पदाधिकार्यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडले. आता हे आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. मुंबई आणि धारावी अदानीला दिली जात आहे. हे सगळे दोन व्यापारी करत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आपली सत्ता आल्यावर अदानीचे धारावीचे कंत्राट
रद्द करू. मुंबईचा विकास करण्यासाठी महापालिका पुरेशी आहे. एमएमआरडीएची गरज नाही. त्यामुळे एमएमआरडीए सुद्धा बंद करू, असे
ठाकरे म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले. अनेकांनी मी देशाला दिशा दाखवली असे सांगितले. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ असतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की, आपण वाकडे करतो. भाजपा म्हणजे चोर कंपनी आहे. ही राजकारणातील षंढ माणसे आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपावर हल्ला चढवला. केवळ घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते. आपल्या बुथमधून जास्तीत जास्त मतदान करून घ्या. मशाल चिन्हाचा प्रचार करा. आपले हिंदुत्व यांच्यापेक्षा वेगळे आहे. हिंदू आणि मुस्लिमांनाही हे हिंदुत्व पटते. हिंदुत्वाचा भगवा झेंडा भगवाच राहू द्या. त्यावर मशालीचे चिन्ह लावू नका, अशा सूचना ठाकरे यांनी
शिवसैनिकांना केल्या.
आताही ज्या कोणाला जायचे असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचे असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. मी केवळ तुमच्या ताकदीवर आव्हान देत आहे. मी म्हणजे तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तर तुमची धडकी भरली आहे. लोकसभा निवडणुकीत या चोरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि धनुष्यबाण चिन्हाला मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. आगामी निवडणुकीसाठी मशाल चिन्हाचा प्रचार करा. शंकराचार्यांनी म्हटले की, आपल्याशी गद्दारी झाली. जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही. याचा प्रचार करा, अशा सूचना शिवसैनिकांना केल्या. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याला नक्की मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपाचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे यांच्या विधानावर भाजपाने प्रत्त्युत्तर दिले. मुस्लीम आणि ख्रिश्चन मतांच्या भरवशावर मी त्यांना पाहून घेईल. तू राहशील नाहीतर मी राहील, अशी भाषा उद्धव ठाकरे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जर ही भाषा ऐकली असती, तर त्यांना काय वाटले असते, हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत का, असा सवाल करत भाजपा आरे ला कारे केल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मोदींनाही आव्हान
लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींना घाटकोपरमध्ये रोड शो करावा लागला. येत्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी प्रचाराला यावे. तुमची उरली सुरली गुर्मीही उतरवू. मी थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होते ते सगळे मी केले. हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणारा कोणी राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले.