उरण – नवी मुंबईचा विकास झाल्यानंतर उरणला लोकल येईल,अशी अपेक्षा होती. मात्र, वनविभागाच्या खारफुटीच्या प्रश्नामुळे ही लोकल अनेक वर्षे रखडली होती.गेल्या काही वर्षांपासून उरण ते नवी मुंबईचा प्रवास हा एसटी,एनएमएमटी, खासगी वाहनांनी करावा लागत असून रस्त्यावरील खड्डे आणि कोंडीला सामोरे जावे लागत होते.मात्र आता उरणकरांची ही लोकल प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.कारण शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास खारकोपर ते उरणदरम्यान या लोकलची चाचणी घेण्यात आली.रेल्वेच्या सीएआरएस पथकाने मध्यरात्री दोन वाजता ही चाचणी घेतली.
मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर असलेले उरण गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीपासून लोकलच्या प्रतीक्षेत आहे. पण आता काही किरकोळ कामे शिल्लक राहिली असल्याने ती पूर्ण होताच याच महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही लोकल सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की,काही रेल्वे स्थानके,पूल,सिग्नल यंत्रणा,वेग आणि काही तांत्रिक चाचण्या पार पडल्या की या मार्गावर प्रवासी वाहतुक सुरू होईल, पण त्याची निश्चित तारीख सांगता येणार नाही, असे सुतार म्हणाले.
दरम्यान,नेरुळ-उरण हा २७ किमी लांबीचा हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प असून त्याला १९९७ साली मंजुरी मिळाली आहे.पण विविध कारणांमुळे तो अद्याप रखडला होता.या प्रकल्पामध्ये सिडको ६७ टक्के तर रेल्वे ३३ टक्के खर्च करणार आहे.या मार्गावर नेरुळ,सी वूड, सागर संगम,बेलापूर, तरघर,
बामण डोंगरी आणि खारकोपर ही स्थानके असणार आहेत.
उरणकरांची ‘लोकल ‘ अपेक्षा पूर्ण