इम्रान यांना तोशाखाना प्रकरणी पोलिसांनी बजावले अटक वॉरंट

लाहोर :- आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यापुढेही अटकेचे संकट उभे टाकले आहे. इम्रान खान यांच्या निवासस्थानी आज पोलीस अटक वॉरंट घेऊन पोहोचले आणि एकच हलकल्लोळ उठला. इम्रान खान समर्थक मोठ्या संख्येने गोळा झाले. पोलिसांनीही कारवाईत अडथळा न आणण्याचा इशारा इम्रान खान समर्थकांना दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इम्रान खान विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफचे नेते आणि इम्रान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र येण्यास सांगितले आहे. इम्रान खानला अटक झाल्यास देशात अराजकता पसरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

28 फेब्रुवारीला इम्रान यांना अनेक खटल्यांमध्ये हजर करण्यात आले होते. वेगवेगळ्या कोर्टात सुनावणी झाली. त्यात त्यांना तोशाखाना प्रकरण वगळता इतर प्रकरणात दिलासा मिळाला. पण तोशाखाना प्रकरणात त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहिली होती. न्यायालयाने इम्रानविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

तोशाखाना हा मंत्रिमंडळाचा एक विभाग आहे. या विभागात राष्ट्रप्रमुख किंवा इतर सर्वोच्च नेते परदेशी पाहुण्यांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू ठेवतात. नियमानुसार इतर देशांच्या प्रमुखांकडून किंवा अन्य मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवणे आवश्यक असते. २०१८ मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. अरब देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना खूप महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. अरब तसेच युरोपीय देशांकडूनही अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या. पण या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवण्याऐवजी इम्रान खान यांनी स्वस्तात विकत घेतल्या आणि नंतर मोठ्या नफ्यात विकल्या. त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर परवानगी दिली होती. या संपूर्ण व्यवहारातून इम्रान यांना सहा कोटींचा फायदा झाला होता. त्यांनी २.१५ कोटी रुपयांना वस्तू विकत घेतल्या आणि त्या विकून ५.८ कोटी रुपायांचा नफा कमावला.

विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. दुसरीकडे इम्रान यांनी या भेटवस्तू आपणांस वैयक्तिकरित्या देण्यात आल्याने त्यावर आपला अधिकार असल्याचा दावा केला होता. इम्रान खान यांना त्यांच्या साडेतीन वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जगभरातील विविध नेत्यांकडून १४ कोटींहून अधिक रुपये किमतीच्या ५८ भेटवस्तू मिळाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

Scroll to Top