आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन आणि शालेय शिक्षण देणार्या अनेक खासगी वारकरी शिक्षण संस्था आहेत. या संस्थांमध्ये कमीत कमी १० ते जास्तीत जास्त २०० विद्यार्थी असतात. मुले आणि मुलींच्या काही एकत्र तर काही वेगवेगळ्या शाळा आहेत. मात्र या शाळांत मुलांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या, असा एकमुखी ठराव मंजूर केला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये आळंदीतील काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यावर पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई केलेली आहे. या प्रकरणातील संबंधितांना शिक्षा झाली आहे. तर काही जण शिक्षा भोगत आहेत. परंतु या घटनेनंतर अशा गैरप्रकारांना आळा बसेल, असे आळंदीकरांना वाटत होते. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीचे नाव बदनाम होत आहे.या घटनांचा तीव्र निषेध करण्यासाठी नुकतीच आळंदीकर ग्रामस्थांची ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्यात, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.