अमरावती :- राज्य परिवहन महामंडळाने एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या ५० फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यात लांब, मध्यम फेऱ्यांचा समावेश् आहे. त्यामुळे महिन्याकाठी एसटी महामंडळाला तब्बल स्वव्वा कोटींचा फटका बसत आहे. सोबतच प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. दररोज पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आहे.
अमरावती विभागातील १०४ एसटी बस एक्सपायर झाल्या आहेत. मागील दोन वर्षापासून लांब पल्याच्या २१ मध्यम आणि मध्यम पल्ल्याच्या २९ बस फेऱ्या अशा ५० बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाला पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास कमी झाला आहे. दरम्यान, अमरावती विभागाने एसटी महामंडळाकडे १०० नवीन बसची मागणी केली होती. त्यापैकी २० बस आगामी काही दिवसांत मिळणार असल्या तरी आजघडीला ज्या बस आहेत. त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. त्यापैकी काही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.