मुंबई :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात राष्ट्रवादीचे निलंबित माजी आमदार रमेश कदम यांना आठ वर्षांनी जामीन मंजूर झाला आहे. १ लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रमेश कदम यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. परंतु, जामीन मंजूर झाला असला तरी अन्य प्रकरणांमध्येही अटक असल्यामुळे रमेश कदम यांची तुरूंगातून सुटका होणार नाही.
माजी आमदार रमेश कदम यांनी तपासात सहकार्य करावे, शिवाय मुंबई-ठाणे हद्द न सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी रमेश कदम यांना आठ वर्षापूर्वी अटक केली होती. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना भायखळ्याच्या पुरुष कारागृहात हलवण्यात आले. अण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३७०० पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला.