सांगली- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असताना माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी निवडणुकीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगलीचा असेल का, हे काळ ठरवेल, मात्र येत्या काळात काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होईल हे नक्की, असे भाकीत विश्वजीत कदम यांनी केले. सांगलीच्या मिरजेमध्ये खासदार विशाल पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विश्वजीत कदम बोलत होते.
सत्कार कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी विश्वजीत कदम यांनी सांगितले की, लोकांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले मताधिक्य दिले आणि उमेदवार निवडून दिले. विशाल पाटीलही विजयी झाले. आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल.