कराड- तालुक्यातील तांबवे गावातील एका मच्छिमाराने नुकताच कोयना नदीपात्रात तब्बल २५ किलो वजनाचा ‘कटला’ मासा पकडला. या माशाला पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.विशेष म्हणजे खरेदीसाठी आणि वाटाघाटी करण्यासाठी अनेकजण रांगेत उभे होते.
सध्या अधूनमधून पडणाऱ्या तुरळक पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांच्या कडाक्याची उष्णता आणि कोरड्या नद्यांनंतर मच्छीमार मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरत आहेत.तांबवे येथील हजरत पठाण या मच्छिमाराने शुक्रवारी रात्री कोयना नदीत मासे पकडण्यासाठी जाळे टाकले होते.शनिवारी सकाळी त्याच्या जाळ्यात एक मोठा कटला मासा अडकलेला आढळला.इतर मच्छिमारांच्या मदतीने तो मासा आणि अन्य काही मासे आपल्या घरी आणले.ही बातमी कळताच अनेकजण पठाण यांच्या घराकडे धावू लागले. यावेळी हा मासा पाहण्यासाठी आणि काहींनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.बऱ्याच वाटाघाटीनंतर सात-आठ ग्राहकांनी हा गोड्या पाण्यातील मासा २०० प्रति किलो दराने खरेदी केला.
दरम्यान,कटला माशाला दक्षिण आशियाई कार्प या नावानेही ओळखले जाते, उत्तर भारत,बांगलादेश, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तानमधील नद्या आणि तलाव हे त्याचे मूळ आहे. पूर्वेकडील भारतीय राज्यांमधील तलावांमध्ये त्याची पारंपरिक शेती केली जात होती.