मुंबई- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना, ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा शिवसेना, शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी केवळ 48 मतांनी पराभव केला . तर कोकणात रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा भाजपाच्या नारायण राणे यांनी पराभव केला. हे दोन्ही पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागले आहेत. या दोन्ही उमेदवारांसाठी उबाठा गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल केली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागणार आहोत असे उबाठा गटाने सांगितले. ..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले कीं विनायक राऊत यांच्या मतदारसंघात काय घडलं हे मी ऐकलं, त्या संदर्भातही आम्ही कोर्टात जाणार आहोत.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नारायण राणे यांना ४,४८,५१४ मते मिळाली असून, प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत यांना ४,००,६५६ मते मिळाली आहेत. नारायण राणेंनी जवळपास ४७००० हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विनायक राऊतांवर विजय मिळवला आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विनायक राऊत विजयी झाले होते, त्यामुळे ते येथून पुन्हा हॅट्ट्रिक करतील अशी शक्यता वर्तवली जात होती, तर त्यांना रोखण्यासाठी भाजपाने नारायण राणेंना मैदानात उतरवले होते. २००९ मध्ये नारायण राणेंचा मोठा मुलगा निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला होता. त्यावेळी त्यांनी भाजपा आणि शिवसेनेचे संयुक्त उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता.
रत्नागिरी सिंधुदुर्ग हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवलेले निलेश राणे यांचा १.७८ लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत निलेश राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, तेव्हा राऊत यांनी त्यांचा १,५०,०५१ मतांनी पराभव केला होता. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवली, या निवडणुकीत विनायक राऊत पराभूत झाले. या निकालाच्या विरोधात उबाठा दाद मागणार आहे .