नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.याबाबत चौकशी करून सरकार आणि शेअर बाजार नियामक सेबीकडून अहवाल सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अधिवक्ता विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे.
याचिकाकर्ते विशाल तिवारी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बाजारात मोठी घसरण दिसून आली.यात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी नियामक यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.एक्झिट पोलनंतर बाजार अचानक वर गेला,पण जेव्हा निकाल लागला तेव्हा बाजार कोसळला.त्यामुळे नियामक प्राधिकरण आणि त्याच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.याबाबत चौकशी होण्याची गरज आहे.
दरम्यान,त्यादिवशी सेन्सेक्समध्ये ६३०० अंकांची आणि निफ्टीमध्ये २००० अंकांची घसरण झाली.परंतु खालच्या स्तरावरून रिकव्हरी झाल्यानंतर सेन्सेक्स ४३८९ अंकांनी आणि निफ्टी १३७९ अंकांच्या घसरणीसह बंद झाला व गुंतवणूकदारांना एका सत्रात ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.त्यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांना बाजारातील घसरणीसाठी जबाबदार धरले होते. या संपूर्ण प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी त्यांनीही केली होती.