धाराशिव : जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनगिरी येथे कोरड्या विहीरीत पडल्याने शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेच्या तिसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार उघडकीस आला. परंडा पोलिसांनी मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढला.
धाराशिवच्या सोनगिरी येथे घडलेल्या घटनेत अशोक गायकवाड असे मृत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. अशोक गायकवाड हा मुळ सातारा जिल्ह्यातील वाई येथील असून सोनगिरी येथे सासरवाडीत मजुरीचे काम करीत होता. गायकवाड हे कामावर गेल्यानंतर ६ फेब्रुवारीपासून ते घरी आले नसल्याने कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरु होता. मात्र ते घरी न आल्याने मुळ गावी गेले असतील असा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी बांधला होता. मात्र सोनगिरी येथील आंगत वेताळ हे गृहस्त ८ फेब्रुवारीला शेतात गेले असता शेताच्या कडेला चप्पल दिसल्याने विहीरीत डोकावून पाहीले. यावेळी त्यांना विहिरीत व्यक्ती पडलेला दिसून आला. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन ७० ते ८० फुट धोकादायक विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.