मुंबई
मुंबई-गोवा महामार्गावरील काल मध्यरात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास एका खासगी बसला भीषण आग लागली. ही बस रत्नागिरीहून मुंबईकडे येत होती. महाड जवळील सावित्री नदीवरील पुलाजवळ येताच बसने पटे घेतला. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घटनेवेळी बसमध्ये २२ प्रवासी होते.
बसच्या टायरला आग लागली असताना बसमधून प्रवास करत असलेल्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखविले. टायरला आग लागल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्याने इतर प्रवाशांना त्याची कल्पना दिली आणि वेळीच सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. आर्यन भाटकर असे या प्रसंगावधान दाखवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या आगीत प्रवाशांचे बसमधील लाखो रुपयांचे सामान जळाले. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यशस्वीरित्या आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक थांबली होती.