सावंतवाडी- सावंतवाडी ते आंबोली घाटरस्त्याच्या कामामध्ये तब्बल ४० कोटीपेक्षा जास्त निधीचा भ्रष्टाचार झाला आहे. यातून कामावर देखरेख ठेवणारे बांधकाम अधिकारी गब्बर झालेले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची व खात्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
आंबोली घाटरस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी बांधकाम विभागाकडे यापूर्वी संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. सोमवारी पुन्हा एकदा त्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांच्याकडे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी सादर केलेल्या निवेदनात त्यांनी या कामांचे तपशीलही दिले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर उपस्थित होते. आंबोली घाटरस्त्यावर २०१० ते २०२४ या कालावधीत झालेल्या शासकीय निधीच्या खर्चाची व संबंधित कामाची माहिती मागत या कामावर ज्या संबंधित अधिकाऱ्यांची देखरेख होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण केली असल्याची माहिती बबन साळगावकर यांनी दिली.