परभणी – सध्या रब्बी हंगाम सुरू असून रब्बी हंगामातील महत्त्वाची गहू आणि हरभरा ही पिके असतात.परंतु या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना या पिकांच्या काढणीबाबत सतर्क करणारी माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.येत्या ४ मार्चपासून हवामानात बदल होणार असून राज्यामध्ये ५ ते १० मार्च दरम्यान विविध जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. याच दरम्यान होळी सण येत आहे.त्यामुळे तोपर्यंत शेतकर्यांनी आपली गहू हरभरा ही पिके काढून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
पंजाबराव डख यांच्या मते येत्या पाच मार्चपासून महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र म्हणजेच नंदुरबार, धुळे, या तीन जिल्ह्यात तसेच अहमदनगर,शिर्डी,नासिक आणि बीड जिल्ह्यातील माजलगाव व पुणे जिल्ह्यातील शिरूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.एवढेच नाही तर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात देखील या कालावधी दरम्यान पावसाची शक्यता आहे. म्हणजेच एकंदरीत ५ मार्च ते १० मार्च असे पाच दिवस राज्यामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.परंतु या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, नासिक आणि अहमदनगर या जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार या कालावधीत सरासरी एक इंच पर्यंत पाऊस कोसळू शकतो.त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये नक्कीच यामुळे वाढ होणार आहे.