हैद्राबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि सत्ताधारी भारत राष्ट्र समिती यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री काँग्रेस निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू यांच्या कार्यालयावर छापा टाकला.तिघांना अटक केली आहे.कॉंग्रेसने केसीआर यांच्यावर संताप व्यक्त करून ही बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा आरोप केला आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आणि सोशल मीडियावर राज्य सरकार आणि बीआरएस विरुद्ध बदनामीकारक टिप्पण्या केल्याप्रकरणी सुनील कानुगोलू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या संदर्भात हैदराबाद पोलिसांच्या सायबर शाखेने माधापूर येथील कानुगोलूच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कार्यालयात काम करणाऱ्या काही लोकांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणेही जप्त केली या उपकरणांचा उपयोग अवमानकारक पोस्टसाठी केला जात होता. अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, इनॉर्बिट मॉलजवळील कानुगोलू कार्यालयातून येणाऱ्या आयपी पत्त्यांवर चुकीची माहिती आणि अपमानजनक टिप्पण्या पोस्ट केल्या जात आहेत. असे पोलिसांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे म्हणणे आहे की, पक्षाच्या निवडणूक रणनीती पथकातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.सुनील कानुगोलू यांचे कार्यालय काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीची वॉर रूम होती. सायबर क्राईम पोलिस अधिकाऱ्यांनी येथे झडती घेतली आणि निवडणूक रणनीती टीममध्ये सामील असलेल्या लोकांना अटक केली.पोलिसांना पाच वेगवेगळ्या व्यक्तींकडून पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि त्या आधारे ते कारवाई केली आहे. याशिवाय पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.