पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फुट पडून दोन गट निर्माण झाले.त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर इतर पक्षातील आमदार, खासदार, मंत्री, नेते, कार्यकर्ते हे पक्षांतर करू लागले.एकीकडे शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.शिंदे गटातील तीन आमदार आमच्या संपर्कात आहे. तर हिवाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.शिंदे गटातील तीन आमदार व भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या आमदारांवर विश्वास असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल असे देखील मिटकरी म्हणाले.आमच्या संपर्कात असलेले शिंदे गटातील तीन आमदार हे विदर्भ,मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मधील आहेत. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत पण आकडा आता सांगणार नाही असे देखील अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.