देवगड – राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटने शेगांवचे राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर येत्या शुक्रवार २१ ऑक्टोबर पासून विजयदुर्ग-रत्नागिरी बोरिवली एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. ही बस विजयदुर्ग येथुन दुपारी ३.४५ व बोरीवली येथुन संध्याकाळी ६.०० वाजता सुटणार आहे. या बसचे संगणकीय आरक्षण www.msrtc.gov.in व एसटी बसस्थानक आरक्षण खिडकीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर छन्ने व वाहतुक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगावचे संघटनमंत्री ओमकार माळगावकर यांनी ही एसटी बस सुरू करण्याची मागणी केली होती.त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. तरी आता या बससेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा,असे आवाहन एसटी प्रशासनाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर छन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप,विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ, विजयदुर्ग आगार व्यवस्थापक वैभव पडोळे,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ शबनम शेख, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग हे महत्वाचे ठिकाण असून वेगाने विकसित होणारे हे गाव आहे. या गावातील लोक व्यापार, व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबईतल्या माहीम,माटुंगा, वांद्रे,विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरात कार्यरत आहेत. तरी विजयदुर्ग परिसरातील नागरिकांना या ठिकाणच्या आपल्या नातेवाईकांकडे येण्या-जाण्यासाठी पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने ही बससेवा कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती.