मुंबई – शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकासकामे, बांधकामे यांसह हवेतील बदल आणि गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. प्रदूषणासाठी धूळ हा घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. धूळ नियंत्रण आणि उपाययोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पालिकेकडून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने सात दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असा आदेश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. या अहवालाच्या आधारे, १ एप्रिल रोजी बीएमसीकडून धूळ नियंत्रणाच्या उपायांवर एक मानक कार्यप्रणाली जारी केली जाईल. उल्लंघन करणाऱ्यांवर ‘स्टॉप वर्क नोटीस’ जारी करण्यासह कारवाई केली जाऊ शकते असे चहल यांनी सांगितले. या समितीचा मुख्य उद्देश धूळ प्रदूषणामागील तात्काळ कारणे ओळखणे आणि लवकरात लवकर अंमलात आणल्या जाऊ शकणार्या प्रतिबंधात्मक उपायांचा विकास करणे हा आहे.