मुंबई – राज्यात आजपासून महिलांना एसटीचा प्रवास अर्ध्या किंमतीत करता येणार आहे. अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटी बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती, या घोषणेच्या अंमलबजावणीला आजपासून सुरूवात झाली. अर्ध्या तिकिट दरात प्रवास करायला मिळाल्याने महिलावर्गात आनंदाचे वातावरण होते. या योजनेला एसटी महामंडळ स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाणार आहे. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना तिकीट दरात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तर ६५ ते ७५ वयोगटातील जेष्ठांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.
राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. यावेळी त्यांनी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर त्यांनी महिलांना सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचे जाहीर केले होते.