*ममता बॅनर्जींचा इशारा
नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मेघालयातील निवडणूक रॅलीत भाजपवर हल्लाबोल केला. त्यांचा पक्ष बाहेरून आलेल्या लोकांना ईशान्येकडील राज्यातील रहिवाशांवर सीएए आणि एनआरसी लागू करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच त्यांनी राज्यातील संगमा सरकारवर विकासाची कामे करत नसल्याचे म्हणत घोटाळा केल्याचा आरोपही केला.
”टीएमसी मेघालयचा विकास करू शकते. हे सरकार बदला. इथे काहीही नाही; मेडिकल कॉलेज नाही, उपचारासाठी चांगली आरोग्य व्यवस्था नाही” असे म्हणत स्वतःच्या पक्षाला मतदान करण्याची विनंती केली. त्याचबरोबर ”मेघालयात टीएमसीला मतदान करा, आम्ही भाजपला दिल्लीतून हद्दपार करू” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
राज्यातील २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ११९ कंपन्या मेघालयमध्ये तैनात आहेत. एकूण ४० तुकड्या आधी तैनात करण्यात आल्या होत्या त्यानंतर आणखी ७९ कंपन्या त्रिपुरा निवडणुकीनंतर समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मेघालयच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.