रायगड – मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर नजीकच्या कशेडी घाट रस्त्यावर चोळई गावच्या वळणावर वाळूचा डंपर रिक्षावर उलटून भीषण अपघात झाला. त्यात ३ विद्यार्थिनींसह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे (२३), आसिया सिद्दीक (२०), नाजमीन मुफीद करबेलकर (२२) आणि अमन उमर बहुर (४६) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातानंतर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारच्या वतीने प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली.
वाळूने भरलेला डंपर मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर नजीकच्या कशेडी घाटमार्गावरील चोळईच्या हद्दीतील अवघड वळणावर आला तेव्हा चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि तो रिक्षावर उलटून अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळतात पोलिस, बचाव पथक आणि महसूल विभागाचे अधिकारी कशेडी घाटात दाखल झाले. अवजड डंपरला रिक्षावरून हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या अपघातात ३ विद्यार्थिनी आणि रिक्षाचालक असे ४ जण जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनी परीक्षा आटोपून रिक्षाने घरी परतत होत्या. त्या माणगाव तालुक्यातील गोरेगावच्या आहेत. खेड येथे त्या परीक्षेला निघाल्या होत्या. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे, अमन उमर बहुर, आसिया सिद्दीक आणि नाजमीन मुफीद करबेलकर अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी दुःख व्यक्त करून सरकारच्या वतीने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे, असे सांगितले.