मुंबई – वर्षाच्या अखेरीस जगभरात कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली होती. ज्यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. तसेच मास्कसक्तीही करण्यात आली होती. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने मुंबई विमानतळावर परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथून येणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंगच्या ७२ तास आधी कोविड आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल देणे सक्तीचे केले होते. ही चाचणी नकारात्मक असेल तरच भारतात प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचण्या सुरू केल्या होत्या. या दरम्यान काही प्रवासी कोरोनाबाधित आढळले होते. हळूहळू ही संख्या कमी होऊन शून्यावर आली आहे.