नागपूर – राज्यातील काँग्रेसमधील अतंर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांकडून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २१ नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेत नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसमधील अनेक नेते हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामावर नाराज असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २१ नेत्यांनी निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेतली आहे.या नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव खान नायडू, प्रदेश काँग्रेसचे सदस्य प्रकाश मुगदीया,सरदार महेंद्र सिंग सलूजा,इक्राम हुसैन यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे.नाना पटोले यांना हटवून आदिवासी नेते शिवाजी मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी या नेत्यांनी रमेश चिन्निथाला यांंच्याकडे केली आहे.नाना पटोले यांच्यामुळे पक्षात गटबाजीला सुरुवात झाली. नाना पटोले यांची पक्षात मनमाणी सुरू आहे. काँग्रेसमध्ये नानागिरी सुरू करणार असे ते म्हणतात. ते कोणाचेच ऐकत नाहीत. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे आणि त्यांच्या जागी आदिवासी नेते शिवाजी मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करावे अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. या प्रकरणात आपण लवकरच काँग्रेस हायकमांडची देखील भेट घेणार असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे.