पंढरपूर- वाराणसी आणि उज्जैनच्या धरतीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्याची सरकारच्या घोषने विरोधात टाळ मृदंगाच्या गजरात आज वारकऱ्यांनी आंदोलन केले. संत नामदेव पायरी येथे वारकऱ्यांनी भजन करून नामदेव पायरी पासून या मोर्चाला सुरुवात केली. विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा मारून हा दिंडी मोर्चा पंढरपूर शहरातून काढण्यात आला.
पंढरपुरात होणाऱ्या प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सर्व वारकरी संघटनांनी विरोध सुरू केला. हा विकास आराखडा रद्द करावा या मागणीसाठी आज आंदोलन झाले. या आंदोलनात संतांचे वंशज देखील सामील झाले होते. या मोर्चामध्ये विविध वारकरी संघटनांचे पदाधिकारी व वारकरी महाराज मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रस्तावित कॉरिडोर रद्द झालाच पाहिजे ही मागणी जोर धरू लागली आहे.यापू्र्वी नागरिकांनी मोर्चा काढत विरोध केला. आताही नागरिकांनी आपली दुकाने, घरांवर काळे फलक लावत निषेध सुरू केला होता.
आमचा पंढरपूरच्या विकास कामाला विरोध नाही. ज्या वास्तू पौराणिक आणि ऐतिहासिक आहेत त्या जमिनदोस्त करून त्यावर हा कॉरिडोर होणार आहे. हे असे कॉरिडोर आम्हाला मान्य नाही. सदर कॉरिडोरला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चंद्रभागेच्या मोकळ्या जागेवर होऊ शकतो. ऐतिहासिक विठ्ठल मंदिर परिसरात हे कॉरिडोर नको अशी ठाम भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर या कॉरिडोरच्या संदर्भात वारकरी आणि स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे. दरम्यान पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती’ समवेत मिळून नवा विकास आराखडा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लवकरच सादर करण्यात येईल.