मुंबई – राज्याच्या ग्रामविकास विभागातील विविध पदांची भरती उमेदवारी अर्ज मागवूनही मागील चार वर्षापासुन रखडत पडली आहे. तब्बल १३ हजारांहून अधिक पदांची ही भरती प्रक्रिया शासन राबवू शकलेले नाही. त्यामुळे सरकारच्या या वेळकाढूपणा विरोधात ‘कॉप्स ‘ ही विद्यार्थी संघटना उद्या सोमवार २३ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आठ हजार पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात काढली पण ग्रामविकास विभागातील१३ हजारांहून अधिक पदांचा तिढा मात्र अजून तसाच आहे. चार वर्षांपूर्वी २०१९ च्या मार्च महिन्यात या विभागातील १३,५२१ पदांसाठी जाहिरात काढली. त्यावेळी १२ लाख ७२ हजार ३१९ उमेदवारांनी अर्ज केले. त्यांचे अर्ज शुल्कपोटीचे तब्बल २५ कोटी ८७ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले.पण प्रत्यक्षात अद्याप भरती काही झालेली नाही.आता तर या भरतीसाठी टी.सी.एस आणि आय.वि.पी.एस या दोन कंपन्यांची नेमणूक केली आहे. पण एव्हढ्या मोठ्या संख्येची भरती करून घेण्याची क्षमता या कंपन्यांकडे नाही.तसेच ही भरती ऑनलाइन की ऑफलाईन घ्यावी अशी संभ्रमावस्था सरकारची झाल्याने वारंवार आदेश काढले जात आहेत. तरीही भरतीचा घोळ मिटवता न आल्याने आता आझाद मैदानात ‘कॉप्स’ ने हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला असल्याचे या संघटनेचे अमर एकाड यांनी म्हटले.