एका महिना सिंहांची जोडी क्वारंटाईन राहणार
मुंबई – बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी काल दाखल झाली आहे. सिंहाच्या या जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.मात्र आता या सिंहाच्या बदल्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बजरंग आणि दुर्गा ही वाघाची जोडी गुजरातला दिली जाणार आहे.विशेष म्हणजे मुंबईत आणलेल्या सिंहाच्या जोडीला कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक महिना क्वारंटाईन केले जाणार आहे.
२६ सप्टेंबर रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेव्हा गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी मुनगंटीवार यांनी या सिंहांबाबत चर्चा केली होती.त्यामध्ये गुजरातमधील सिंहाची जोडी उद्यानात पाठविण्यासंदर्भात दोघांचेही एकमत झाले होते आणि त्यांनतर गुजरातमधील आशियायी सिंह मुंबईत दाखल झाले आहेत.तर मुंबईतील वाघ लवकरच गुजरातला रवाना होणार आहेत.ही सिंहाची जोडी तब्बल २१ तासांचा प्रवास करत काल मुंबईत पोहोचली.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये १९७५ -१९७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली आहे.सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.पण केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्यामुळे इथल्या सिंहांची संख्या कमी झाली. मागील महिन्यात १७ वर्षीय सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला होता.
दरम्यान ७० वर्षांनंतर भारतामध्ये चित्ते परतले आहेत.यापूर्वी १९५२ मध्ये देशातून चित्त्यांची प्रजात नष्ट झाली होती.भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने २०२० सालात भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली.भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर १९७० साली भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न सुरु केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर यावर्षी डिसेंबर अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.प्रकल्प चित्ता साठी भारत सरकारने एकूण ९० ते ९२ कोटी रुपये एवढा खर्च केल्याचे बोलले जात आहे