नवी मुंबई : – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली. एपीएमसी मार्केटमध्ये सोमवारी कोकणचा हापूस व इतर राज्यातील मिळून ११,०४३ पेट्यांची आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये हापूस ४०० ते १ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये या वर्षी आंब्याचे पीक मुबलक आले. प्रत्येक वर्षी मार्चपासून नियमित आवक सुरू होत असते. परंतु, या वर्षी फेब्रुवारीमध्येच आवक सुरू झाली.
नवी मुंबईच्या एपीएमसीत मार्केटमध्ये सोमवारी देवगड व इतर ठिकाणांवरून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ४ ते ८ डझन पेटीची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल अशी चिन्हे आहेत. आवक वाढू लागली असून मार्चमध्ये आवक अजून वाढून दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.