पालघर- मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. या वाढत्या उष्णतेचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातील वाडा,मोखाडा,जव्हार आणि पालघर भागातील आंबा बागायतदार शेतकर्यांना बसू लागला आहे. या उष्णतेमुळे आंबा पिकांच्या फळाची गळती होऊ लागल्याने हे बागायतदार चिंतेत दिसत आहे.
वाकडूपाडा येथील शिवम मेहता आणि ओंदे येथील बबन सांबरे या बागायतदारांनी सांगितले की,यंदा आंब्याला चांगला मोहोर आल्याने फळधारणाही चांगली झाली आहे.मात्र पाच ते सहा दिवसांपासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या सुपारी एव्हढी असलेली फळे गळू लागली आहेत.पालघर जिल्ह्यातील विक्रमगड भागात हापूस, केसर,लंगडा आणि पायरी आदी विविध वाणांचे उत्पादन घेतले जाते. या फळांना बाजारात चांगली मागणी असते.मात्र यंदा उष्णता वाढल्याने काही ठिकाणी मोहोर करपू लागला आहे.तर काही ठिकाणी लहान लहान फळे गळू लागली आहेत.तरी अशा झाडांचे सर्वेक्षण करून राज्याच्या कृषी विभागाने शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी घनश्याम आळशी या बागायतदार शेतकऱ्याने एका निवेदनाद्वारे केली आहे.